नागपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या कथित दिल्लीतील बदलीच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी उपरोधिक शैलीत, “मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, ” असे सांगत या अफवांना कोणताही आधार नसल्याचे सूचित केले.
गेल्या काही दिवसांपासून फडणवीस केंद्रात जाणार आणि राज्यात नव्या नेतृत्वाला संधी मिळणार, अशा राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना तात्पुरता विराम मिळाला आहे. याचवेळी फडणवीस यांनी राज्य सरकारच्या नव्या कर्जमाफी योजनेचे महत्त्व अधोरेखित करत, डिफॉल्टर शेतकऱ्यांनाही दिलासा देणारा हा निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफींपैकी एक असल्याचे सांगितले.
विदर्भातील पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांनी सिंचनाच्या उपलब्ध साधनांचा योग्य वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असल्याची माहिती देत, तपासात अपात्र ठरलेल्या नमुन्यांशी संबंधित परवान्यांवर आणि दोषींवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले. मोशी दुर्घटनेबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.











Leave a Reply