मंत्रालयातील 550 कर्मचाऱ्यांची मूळ विभागात रवानगी; फडणवीसांच्या CMOचा मोठा निर्णय

मुंबई : मंत्री कार्यालयांमध्ये विहित प्रक्रियेचे पालन न करता कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या देखरेखीखाली तब्बल 550 अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात आले आहे. यामध्ये उसनवारीवर, मौखिक आदेशाने तसेच बाह्य यंत्रणेमार्फत मंत्री कार्यालयात तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महायुती सरकारच्या स्थापनेनंतर मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील तात्पुरत्या पदांसाठी निश्चित रचना करण्यात आली होती. त्यानुसार मंत्रालयातील 40 कार्यालयांसाठी 549 पदे निर्धारित प्रक्रियेतून भरण्यात आली. मात्र, याशिवाय सुमारे 550 जण नियमबाह्य पद्धतीने कार्यरत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या आढाव्यात समोर आले.

या पार्श्वभूमीवर अशा नियुक्त्या रद्द करून संबंधितांना मूळ विभागात परतण्याचे निर्देश देण्यात आले होते. 10 सप्टेंबरपर्यंतची मुदत देत, आदेश न पाळल्यास वेतन रोखण्याचा इशाराही देण्यात आला होता. आता पुढील नियुक्त्या प्रक्रिया आणि पडताळणीनंतरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *