मुंबई : तिरंग्याच्या साक्षीने देशाच्या एकतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत मुंबईत ‘हर घर तिरंगा’ अभियानाची रॅली उत्साहात पार पडली. वरळी येथे आयोजित या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना विकसित भारताच्या संकल्पनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी समाजातील भेद दूर करून देशहिताला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी केवळ सरकारची नसून प्रत्येक नागरिकाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तिरंगा हातात घेऊन एकत्र चालणे म्हणजे केवळ देशभक्तीचे प्रदर्शन नसून संविधान, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वाभिमानाचा जागर असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारताच्या संकल्पनेला 2047 पर्यंत पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला विकसित भारताच्या वाटचालीत अग्रस्थानी ठेवण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.दरम्यान, रॅलीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशभक्तीपर गीत सादर करत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत तिरंग्याला मानवंदना दिली.















Leave a Reply