केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण काय, याबाबत तर्क-वितर्क सुरू असतानाच राजधानीतून केलेले त्यांचे पहिले ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचा गौरव केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीपासून ते उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध सुधारणांपर्यंत प्रधान यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत, त्यांनी व्यापक सामाजिक हितासाठी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. “संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असा संदेशही फडणवीस यांनी आपल्या ट्विटमधून दिला.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, अशा चर्चा सुरू आहेत. त्यातच काही विरोधी नेत्यांकडून त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, नीट परीक्षा प्रकरणावर आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आपल्या तीन प्रमुख मागण्या मान्य झाल्याचा दावा केला आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल न करण्याचा निर्णय आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदत या मागण्यांना सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.या सर्व घडामोडींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा आणि त्यांचे ट्विट हेच सध्या राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरले असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींना कोणते नवे वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











Leave a Reply