महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने सुमारे ₹4,150.46 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्यानंतर राज्य सरकारने सुमारे ₹3,993 कोटींच्या प्रशासकीय मंजुरीलाही हिरवा कंदील दाखवत प्रकल्पाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया वेगवान केली.
काशी विश्वनाथ आणि महाकाल लोक कॉरिडॉरच्या धर्तीवर विकसित होणारा हा प्रकल्प पुढील ५० वर्षांतील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. यात रस्त्यांचे रुंदीकरण, पार्किंग, पादचारी सुविधा, स्वच्छता, नदी परिसराचा विकास आणि भाविकांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प ३० महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना योग्य मोबदला आणि पुनर्वसन मिळेल, यावरही भर दिला आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि मंदिर परिसरातील सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबविण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली आहे. त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉर हा केवळ विकास प्रकल्प नसून श्रद्धा, सुविधा आणि वारसा जपणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम मानला जात आहे.















Leave a Reply